पिरंगूट : केंद्रीय महामार्ग आणि रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांनी पुणे ते कोलाड या राष्ट्रीय महामार्ग ७५३ ची सुद्धा पाहणी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. चांदनी चौक ते माले या अंतरासाठी १६९ कोटी रुपये शासनाने टाकलेले आहेत परंतु आत्ता जर त्याकडे दुर्लक्ष केले तर एवढे करोडो रुपये खर्च करुनही मुळशीकरांना पून्हा मनस्तापाला सामोरे जावे लागणार आहे.
सुरुवातीपासूनच या रस्त्याबाबत ठेकेदारांनी कोणतेही नियम पाळलेले दिसत नाही अतिशय हलगर्जीपणा करत या रस्त्याचे काम सुरू आहे. वास्तविक पाहता मुळशी तालुक्यांमध्ये भूगाव, पिरंगुट ,धनवेवाडी या घाटांमध्ये मोठी मोठी वेडीवाकडी वळणे तसेच तीव्र चढ आणि उतार आहेत ते उतारा कमी करण्याची गरज होती तसेच तीव्र वळणे कमी करण्याची गरज होती परंतु याबाबत कोणत्याही प्रकारची कामे झालेली नाहीत. उलट अपघातांचे प्रमाण या घाटामध्ये वाढले आहे. पिरंगुट घाटामध्ये सुक्यामोरी जवळ मध्येच उंचवटा झालेला आहे दोन्ही रस्त्यांचे जोड ठेकेदाराला जोडता आले नाहीत. या ठिकाणी नदिसणारे गतिरोधक तयार झाले आहे.पुण्याकडून उताराने वाहने जोरात येतात आणि या ठिकाणी जोरात आदळतात.
या ठिकाणी अभियंत्यांनी अजिबातच लक्ष दिले नाही त्यामुळे हा सर्व प्रकार झालेला आहे असा आरोप येथून जाणारे येणारे वाहन चालक करत आहेत. तसेच पिरंगुट घाटातील भूगाव भुकूमहद्दी जवळ असलेल्या म्हसोबाच्या खिंडीमध्ये अतिशय तीव्र उतार आहे समोरून आलेली गाडी सुद्धा दिसत नाही त्यामुळे या ठिकाणी पूर्वीपासून अपघात होत आलेल्या आहेत या रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर नागरिकांना अपेक्षा होती की या ठिकाणी तीव्र उतार असलेला तो टप्पा कमी करण्यात येईल आणि अपघाताचे प्रमाण कमी होईल परंतु तसे काहीही झाले नाही उलट समोरून येणारे वाहन चालकांना दिसतच नसल्यामुळे याठिकाणी अपघातांची संख्या वाढली आहे. भूगाव,भुकूम हद्दी जवळ गारवा रिसॉर्ट च्या समोर प्रचंड मोठे तीव्र उताराचे आणि अतिशय अवघड वळण आहे त्या ठिकाणी सुद्धा कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही त्यामुळे या ठिकाणी सुद्धा अपघातांमध्ये वाढ झाली आहे.
वास्तविक पाहता या ठिकाणी डोंगरावरून वाहून येणाऱ्या पाण्याचे प्रमाण जास्त आहे. साईड गटर नसल्यामुळे पाणी रस्त्यावरच वाहत आहे. त्यामुळे अनेक दुचाकीस्वार महिला लहान मुलांना घेऊन सुद्धा पडलेल्या आहेत. तालुक्याचे दुर्दैव म्हणावे की काय या रस्त्याचा ठेकेदार कोणाला जुमानत नाही. खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संग्राम थोपटे यांनी वारंवार सूचना देऊन सुद्धा रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. पिरंगुट घाटामध्ये अनेक ठिकाणी अर्धवट कामे झालेली आहेत त्या ठिकाणी लवकरात लवकर कामे उरकून घेण्याची गरज होती नेमकी त्याच ठिकाणी कामांना उशीर झाल्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघात या ठेकेदार निर्मित समस्यांना मुळशी करांना तसेच कोकणात जाणाऱ्या आणि पुण्यात येणाऱ्या नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.